रत्नागिरी:-सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्यावतीने संचालक, पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय, (महाराष्ट्र शासन) यांच्यामार्फत कातळशिल्प जतन कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत १७ गावातील कातळशिल्प ठिकाणांचा समावेश आहे. कातळशिल्प ठिकाणांच्या आवश्यकतेनुसार संरक्षित कठडा, माहिती फलक, दिशादर्शक फलक, स्वच्छतागृह, विविध उपयोगी शेड अशा बाबींचा समावेश या नियोजनात करण्यात आला आहे. जागामालकांची जागा अधिग्रहित न करता मालकी हक्क अबाधित ठेवण्यात येतो. या उपक्रमाची सुरवात उक्षी ठिकाण क्र. 2 पासून रविवारी करण्यात आली आहे.Ukshi Petroglyphs
Ukshi Petroglyphs उक्षी कातळशिल्प असलेल्या जागेचे मालक काशिनाथ देसाई आणि कुटुंबीय यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाला केली. माजी सरपंच मिलिंद खानविलकर, माजी उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे, मंगेश नागवेकर, गावकर गणपत घाणेकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष पोमेंडकर, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी केकडे, ठेकेदार प्रतिनिधी देविदास मोरे, ऋत्विज आपटे, सुधीर रिसबूड तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

या प्रसंगी सुधीर रिसबुड आणि मिलिंद खानविलकर यांनी कातळशिल्प परिसर व्यवस्थापन आणि विकास उपक्रमाची माहिती दिली. कातळशिल्प परिसराचा विकास आणि त्यात ग्रामस्थांना सहभाग कसा असावा याबाबत मार्गदर्शन केले. कामाची सुरवात उद्योजक, रत्नसिंधू योजनेचे कार्यकारी संचालक किरण सामंत यांच्या हस्ते करायचे होते. प्रकृती अस्वाथ्यामुळे ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत; परंतु दूरध्वनी संपर्क माध्यमातून त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. या ठिकाणी आतापर्यंत सुमारे ६० हजार पर्यंटकांनी भेट दिली आहे.