रत्नागिरी:- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपद्रव होत असलेल्या वानरांच्या बंदोबस्तासाठी शासकीय यंत्रणेमार्फत चाचणी सुरू झाली आहे
काही दिवसांपूर्वी वानर, माकडांमुळे होणाऱ्या उपद्रवाला आळा घालण्यासंदर्भात अविनाश काळे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भैय्या सामंत यांच्याशी चर्चा केली.
यावेळी वानरांच्या बंदोबस्तासाठी विविध पर्यायांची चाचपणी करण्यात आली. वानर, माकड उपद्रवाबाबत शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाकडे दिलेला आहे. त्यात उपद्रवकारक वानर आणि माकडांना मारण्याची परवानगी हा उपाय तसेच नुकसान भरपाईमधील नवीन तरतुदी सुचवलेल्या आहेत. त्या अहवालाची अंमलबजावणी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी विधानसभा अधिवेशनामध्ये करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी काळे यांनी तात्पुरत्या स्वरूपातील उपायांबाबत वानर, माकडे पकडून नेण्याकरता जिल्हा वनअधिकारी खाडे यांच्याशी बोलून तातडीने वानर, माकडे पकडणाऱ्या माणसांना बोलावून त्यांचे प्रात्यक्षिक घेण्यासाठी सुचविले. जिल्ह्यातील वानर, माकड पकडण्यासाठी ऑर्डर काढायची आणि त्यासाठी लागणारा निधी शासनस्तरावर पालकमंत्री वन खात्याच्या योजनेतून किंवा जिल्हा नियोजनमधून उपलब्ध करून देतील, असे वनअधिकारी खाडे यांना सांगितले.
रत्नागिरी : वानरांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजनांची चाचपणी
