रत्नागिरी:-स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी गावे हागंदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) केली जात आहेत. या गावातील स्वच्छतेची शाश्वतता राहावी, यासाठी जिल्ह्यात एक ते ३० सप्टेंबरपर्यंत स्वच्छतेसाठी जिल्ह्यातील १०१२ गावांमध्ये कुटुंब भेटी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी दिली.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील ओडीएफ प्लस मॉडेल झालेल्या गावांमधून हे अभियान राबविण्यात येणार आहे. कुटुंब भेटीसाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे घेण्यात आली असून, काही गावांमध्ये ही कामे पूर्ण झाल्याने गाव मॉडेल म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
कुटुंब भेटी अभियान ग्रामपंचायत स्तरावरील सर्व शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, अंगणवाडी, आशा वर्कर, ग्राम रोजगार सेवक, गट समन्वयक समूह समन्वयक यांच्यामार्फत राबविले जाणार आहे. गृहभेटीवेळी कुटुंबातील सदस्यांना काही प्रश्न विचारून माहिती घेण्यात येणार असून त्यासाठी प्रश्नावली तयार केली आहे. त्यामध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक व्यवस्थापन, गाळ व्यवस्थापन याविषयी प्रश्न विचारले जाणार आहेत. याबाबत कुटुंबाला शाश्वत स्वच्छतेविषयी जागृत करण्यात येणार आहे.