सातारा – करोनामुळे गेली दोन वर्षे बंद असलेली सातारा- रत्नागिरी ही सातारा आगाराची बससेवा शुक्रवारी सकाळी सव्वासात वाजता सातारा बसस्थानकातून पुर्ववत सुरू झाली. एसटीच्या पहिल्याच फेरीला प्रवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या पाठपुराव्याची फलश्रुती आज झाली. मान्यवरांच्या उपस्थितीत नारळ फोडून आणि एसटीला हार घालून या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.
सातारा- रत्नागिरी ही बसफेरी गेल्या अनेक वर्षांपासून सातारा आगाराकडून होत होती. सातारा आगारातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या काही बस मार्गांपैकी सातारा- रत्नागिरी हा एक मार्ग होता. मात्र कोरोनाच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून लांब पल्ल्याच्या एसटी सेवा बंद करण्यात आल्या होत्या. परिणामी गौरी गणपतीला साताऱ्यातून कोकणामध्ये जाणाऱ्या कोकणस्थ बांधवांची गैरसोय होत होती. या समस्येचे गाऱ्हाणे कोकण बांधवांनी राजेशिर्के यांच्या माध्यमातून खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे मांडले. उदयनराजे यांच्या निर्देशानंतर राजेशिर्के यांनी शहराच्या पश्चिम भागातील कोकण बांधवांना घेऊन महामंडळाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांना निवेदन सादर केले होते. श्री. पलंगे यांनी या मागणीची तत्काळ दखल घेऊन ही बससेवा सुरू करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार, शुक्रवारी सकाळी सव्वासात वाजता या बससेवेचा शुभारंभ झाला. या बसला प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली. सातारा- रत्नागिरी या बसचे पहिले चालक के. एस. अवकिरे व वाहक एल. एल. मदने यांच्याहस्ते नारळ फोडून एसटीला हार घालण्यात आला. यावेळी सातारा आगाराचे वाहतूक नियंत्रक मंगेश लाड यांचे मोठे सहकार्य लाभले.
यासंदर्भात बोलताना राजेशिर्के म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनामुळेच ही बससेवा सुरू झाल्याचा मोठा आनंद आहे. साताऱ्यात स्थायिक झालेल्या कोकणस्थ बांधवांना गौरी- गणपतीसाठी मिळालेली बससेवा फार मोलाची आहे. श्री. राजेशिर्के यांनी सातारा आगाराचे विभाग नियंत्रण रोहन पलंगे, वाहतूक व्यवस्थापक ज्योती जाधव, वाहतूक नियंत्रक मंगेश लाड यांचे आभार मानले. सातारा- रत्नागिरी ही बस सव्वा सात वाजता सुटून दुपारी साडेबारा वाजता रत्नागिरीत पोहोचणार आहे व पुन्हा रत्नागिरी आगारातून अडीच वाजता सुटून सायंकाळी साडेसात वाजता ती पुन्हा सातारा आगारात येणार आहे.