मालवण:- तालुक्यातील चिंदर गावात गेली तीन दिवसात तब्बल ३६ गुरे दगावली असून गेल्या दोन दिवसांत अकरावर असलेला दगावण्याचा आकडाआता ३६ वर जाऊन पोचला आहे.
यामुळे चिंदर येथील शेतकऱ्यांमध्ये यामुळे घबराट पसरली आहे. चिंदर गावातली बऱ्याच गुरांमध्ये या रोगाची लक्षणे दिसत आहेत. पशूवैद्यकीय विभागाच्या टीम चिंदर गावात कार्यरत असून गुरांवर उपचार करत आहेत. दगावलेल्या गुरांचे विच्छेदन करून पुणे येथील प्रयोगाळेत पाठवलेल्या नमुन्यांचा अहवाल येणे अजून बाकी असून अहवाल आल्यानंतरच या रोगाचे कारण समोर येणार आहे. दरम्यान सोमवारी आमदार वैभव नाईक व मालवण गटविकास अधिकारी आपासहेब गुजर, संजय गोसावी यांनी पशू वैद्यकीय पथक व शेतकरी यांची भेट घेत बाधित जनावरांची पाहाणी केली.
अज्ञात आजारामुळे ही गुरे दगावली असून निश्चित आजाराचे निदान झालेले नाही. रविवारी गुरे दगावण्याचा आकडा अकरा होता मात्र हा आकडा काही तासांतच सोमवारी दुपारपर्यंत ३६ वर पोचला आहे. गुरे दगावण्याची संख्या तासागणीक वाढू लागली आहे. दगावलेल्या गुणांमध्ये गाभण गाई, नांगरणीच्या कामाचे बैल मोठ्या प्रमाणत आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत चिंदर येथील शेतकरी रत्नकांत चिंदरकर. गणेश तावडे, अशोक पाताडे,सुरेखा पाडावे, गोपाळ चिंदरकर,विजय रेवडेकर, श्रीकांतकानविंदे, सुरेंद्र परब,शिवाजी कानविंदे, प्रकाश कानविंदे, गणेश घाडीगांवकर, विल्यम फर्नांडिस, शोभा भरतू, सुभाष पालकर, बाबू पालकर, चंद्रकांत नार्वेकर, महेश गोलतकर, योगेश चव्हाण, प्रमोद तोरस्कर, नारायण पाटणकर, संतोष पाटणकर, अजित सावंत, दत्ताराम पारकर, रुपेश पडवळ, पास्कू फर्नांडिस, संतोष चिंदरकर आदींची मिळून सोमवार दुपार पर्यंत छत्तीस जनावरे दगावली आहेत.
चिंदर गावात गुरंमध्ये अज्ञात आजाराचा फैलाव होण्याचे प्रमाण वाढल्याने पशु वैद्यकीय पथकातील पशुधन विकास अधिकारी डॉ तुषार वेर्लेकर, आचरा येथील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद कांबळी, डॉ परुळेकर यांनी गावातली प्रत्येक गोठ्यात पोहचत गुरांची तपासणी करुन उपचार करण्याचे काम हाती घेतले होते. सध्या कोवळा चारा विपूल प्रमाणात उपलब्ध होत असल्याने खाद्य म्हणून तोच खाल्ला जात आहे. यातून विषबाधा होण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी पशुपालकांनी जनावरांच्या आहारात सुका ओला चाऱ्याबरोबर सरकी पेंडीचा वापर करावा. दोन जनावरांचे शवविच्छेदन करून नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यावर नेमका आजार कोणता याबाबत समजेल. तोपर्यंत पशुपालकांनी आपली जनावरे बाहेर न सोडण्याचे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ तुषार वेर्लेकर यांनी केले आहे. आपल्याकडे आपण जनावरांना पशुखाद्य हे कमी प्रमाणामध्ये देतो. जनावरांना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हिरवा चारा त्याबरोबरच सुक्या चाऱ्याचीही आवश्यकता असते आणि उन्हाळ्यामध्ये सुक्या चाऱ्यासोबत हिरवा चाराही आवश्यक असतो. पण दुर्दैवाने आपल्या भागामध्ये चाऱ्याची लागवड कमी प्रमाणामध्ये होते आणि भाताचा पेंडा आपण जनावरांचा प्रमुख खाद्य म्हणून वापरत असतो. त्यामुळे भाताच्या पेंढ्यांमध्ये ऑक्झालेट नावाचा जो घटक असतो तो शरीरामधील कॅल्शियम खेचून घेतो आणि जनावरांना अजून कॅल्शियमची कमतरता भासते आणि त्यामुळे ती हाडे चघळणे किंवा एखाद्या वस्तू खाण्याची त्यांच्यामध्ये सवय लागते. साधारण गाभण गाई तयार पाडे त्यांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. कारण त्यांची वाढ होण्याची स्टेज असल्यामुळे त्यांना कॅल्शियम फॉस्फरसची गरज जास्त असते आणि ती जर खाद्यामधून परिपूर्ण नाही झाली तर या गोष्टींमध्ये आजार निर्माण होतात.
चिंदर प्रभारी सरपंच दिपक सुर्वे यांच्याशी संपर्क साधल्यावर गुरे दगावण्याची माहिती मिळताच तातडीने आपण दखल घेत भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पर्यंत हि माहिती पोहोचल्यावर जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे पथक तातडीने चिंदरमध्ये पाठवले आहे. गुरे दाखवल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चिंदर गावात गुरे दगावण्याची साथ पसरल्याचे समजल्यानंतर आमदार वैभव नाईक चिंदर गावात दाखल झाले होतें. त्यांनी शेतकरी व पशुवैद्यकीय पथकाशी चर्चा केली यावेळी नाईक म्हणाले की साथ रोखण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना आवश्यक आहेत त्या त्या सर्व करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. जिल्हा पशुधन विभागाशी आपण संपर्कात आहोत. त्यांना साथ रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाणार आहे.