लांजातील मिथिलेश देसाईंच्या फणसाच्या शेतीतून 1 टनाहून अधिक पानांची निर्यात
लांजा : तालुक्यातील झापडे येथील ३१ वर्षीय मिथिलेश देसाई यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक व वैज्ञानिक दृष्टिकोन देत जॅकफ्रूट (फणस) शेतीत क्रांती घडवली आहे. त्यांनी आपल्या २८ एकर शेतीत तब्बल ७० वेगवेगळ्या जातींचे फणस लागवड करून त्याचा यशस्वी व्यवसाय उभारला आहे. विशेष म्हणजे, त्यांची कंपनी जर्मनीला कॅन्सर संशोधनासाठी फणसाची पाने निर्यात करते. तब्बल 1 टन हून अधिक पाने ही जर्मनीला पाठवत आहेत. कॅन्सर वर संशोधन झाल्यास लांजाचे नाव देशाच्या नकाशावर येणार आहे.
मिथिलेश यांचे वडील हरीशचंद्र देसाई यांनी २००० मध्ये केरळ येथे जाऊन ३६ प्रकारच्या फणसाच्या झाडांची माहिती घेतली आणि ती आपल्या शेतात लावली. त्यातून प्रेरित होत मिथिलेश यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आपल्या शेताजवळ एक प्रयोगशाळा सुरू करून फणसाचे पोषणमूल्य, त्यावर प्रक्रिया आणि व्यावसायिक शक्यता यावर संशोधन सुरू केले.
२०१८ मध्ये मिथिलेश यांनी फणसाचे रोपवाटिका केंद्र सुरू केले. त्यांनी वडिलांच्या नावाने ‘हरीशचंद्र’ नावाची फणसाची नवीन जात विकसित केली. पहिल्या वर्षी फक्त १,००० रोपे विकली जात होती, पण आज दरवर्षी २५,००० पेक्षा जास्त रोपांची विक्री होते. वाढत्या मागणीमुळे त्यांनी ९०० शेतकऱ्यांना एकत्र करून ‘फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी’ (FPC) स्थापन केली.
फणसाच्या शिजवलेल्या गराला शाकाहारी मांसाचा उत्तम पर्याय म्हणून पाहिले जाते. तसेच, फणसावर आधारित विविध प्रक्रिया उत्पादने जसे की चिप्स, पीठ आणि पल्प यांना मोठ्या बाजारपेठेत मागणी आहे. आता मिथिलेश हे ११,००० चौरस फुटांचे प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या तयारीत आहेत, ज्यामुळे अधिक शेतकऱ्यांना फणस शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकेल असा त्यांनी विचार करून शेतीची लागवड केली.
मिथिलेश देसाई यांनी पारंपरिक शेतीला विज्ञान आणि व्यवसाय यांची जोड देत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. फणसाला बाजारपेठ मिळवून देऊन त्यांनी अनेक शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवा मार्ग उघडला आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासातून महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्यांना नवा स्फूर्तीमंत्र मिळत आहे. त्यांच्या ‘जॅकफ्रूटकिंग अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी’ने वार्षिक ₹१ कोटींचा टर्नओव्हर साध्य केला आहे.
छोट्याशा गावात त्यांनी केलेली फणस शेती आज परदेशात नावारूपास आली आहे. केवळ फणस विकून नव्हे तर चक्क फणसाच्या पानाचाही योग्य प्रकारे वापर करता येईल का? याचा विचार करून जर्मनीतील कंपनीला फणसाची पाने पाठविली आहेत. या पानातून कॅन्सर सारख्या मोठ्या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. यासाठी जर्मनीत यावर संशोधन सुरू आहे. हे संशोधन यशस्वी झाल्यास भारत देशात रत्नागिरीचे नाव सातासमुद्रापार पोहोचणार आहे. हे नक्कीच रत्नागिरीसाठी कौतुकास्पद असणार आहे.
कोकणातील फणसाच्या पानापासून जर्मनीत होतेय कॅन्सरवर संशोधन
