६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात नियंत्रण कक्ष सुरू
रत्नागिरी: यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने उष्माघाताची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी आरोग्य विभागाने विशेष उपाययोजना हाती घेतल्या असून, जिल्ह्यातील तब्बल ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.
यंदा उन्हाळ्यात तापमानाचा पारा ३८ अंशांपर्यंत पोहोचला होता. त्यात अधिक आर्द्रता असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात उन्हाचा अधिक त्रास जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने तालुका स्तरापासून ते प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरापर्यंत उष्माघात नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या नियंत्रण कक्षांमध्ये विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, समुदाय आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहाय्यक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. यासोबतच प्रत्येक आरोग्य केंद्रात सुस्थितीत वाहन, प्रथमोपचार पेटी, अत्यावश्यक औषधे व साहित्य आणि उष्माघात औषधांचे कीट सज्ज ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिल्या आहेत.
यावेळी डॉ. आठल्ये यांनी नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, नागरिकांनी पुरेसे पाणी प्यावे, प्रवासात पाणी सोबत ठेवावे, हलक्या वजनाचे फिकट रंगाचे सैलसर कपडे वापरावेत. तसेच उन्हात गॉगल, छत्री आणि टोपीचा वापर करावा. घराला थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे आणि कुलरचा वापर करावा. शक्यतोवर उन्हाच्या वेळी घराबाहेर पडू नये आणि कष्टाची कामे उन्हात टाळावी. त्यांनी पुढे सांगितले की, पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नये आणि उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.
नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी:
“सध्या तीव्र उन्हाळा सुरू झाला आहे. उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. जर उष्माघाताची लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्रात संपर्क साधा तसेच १०८ रुग्णवाहिकेला कॉल करा,” असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उचललेल्या या महत्त्वपूर्ण पावलामुळे उन्हाळ्यात नागरिकांना उष्माघाताच्या त्रासापासून मोठा दिलासा मिळणार आहे. नागरिकांनी देखील आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.