रत्नागिरी: पूर्णगड येथे अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या 13 बांगलादेशी नागरिकांना न्यायालयाने 6 महिन्यांची कैद आणि प्रत्येकी 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या आरोपींचे लवकरच प्रत्यार्पण करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवाद विरोधी पथकाला 11 नोव्हेंबर 2024 रोजी पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे राहत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून 13 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाचा कोणताही पुरावा नसल्याने, ते अनधिकृतपणे भारतात राहत असल्याचे स्पष्ट झाले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे:
वाहिद रियाज सरदार
रिजऊल हुसेन कारीकर
शरिफुल हौजिअर सरदार
फारूख महमंद जहिरली मुल्ला
हमीद मुसाफा मुल्ला
राजु अहमंद हजरत अली शेख
बाकीबिलाह अमिर हुसेन सरदार
सैदूर रेहमान मुबारक अली
आलमगीर हुसेन हिरा अबदुल कादर दलाल
मोहम्मद शाहेन समद सरदार
मोहम्मद नुरूझामन मोरोल बालायत अली
मोहम्मद नुरहसन जहर सरदार
मोहम्मद लालतू मोंदल किताब अली
या प्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी पासपोर्ट अधिनियम आणि परदेशी व्यक्ती अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पूर्णगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रत्नदीप साळोखे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
गुरुवार, 03 एप्रिल 2025 रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. रत्नागिरीचे मुख्य न्यायदंडाधिकारी निखिल गोसावी यांनी 13 आरोपींना प्रत्येकी 6 महिने साधी कैद आणि 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांचे आणि दहशतवाद विरोधी पथकातील सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच, त्यांना प्रत्येकी 1000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
रत्नागिरी पोलीस दल या 13 दोषी बांगलादेशी नागरिकांच्या प्रत्यार्पणासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करणार असून, त्यांना लवकरच त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येईल.