चिपळूण: आंबा फळमाशी नियंत्रणासाठी सिंधुरत्न योजनेंतर्गत रक्षक सापळ्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न मेत्रे यांनी दिली.
कोकणामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. या किडीमुळे आंबापिकाचे ३० टक्के नुकसान होते. फळमाशी फळाच्या सालीखाली अंडी घालते. दोन ते तीन दिवसात अंडी उबवून अळ्या फळातील गर खातात. किडलेली फळे गळून पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जाऊन आर्थिक नुकसान होत आहे. या किडीची अळी अवस्था ही सर्वात जास्त नुकसानकारक असते व याचा प्रादुर्भाव हा फळाच्या सालीच्या आत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत कीटकनाशक पोहचत नाही. त्यामुळे फवारणीद्वारे नियंत्रण न करता नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याचा वापर प्रभावी ठरतो.
हे नुकसान नियंत्रित करण्याकरिता कोकण कृषी विद्यापिठामार्फत एकात्मिक कीड व्यवस्थापनांतर्गत प्रतिहेक्टरी ४ रक्षक सापळे वेगवेगळ्या ठिकाणी बागेत लावण्याची शिफारस केली आहे. रक्षक सापळ्यामध्ये फळमाशीच्या नरांना आकर्षित करणारा मिथाईल युजिनॉल नावाचा कामगंध वापरला जातो.
हा कामगंध कापसाच्या बोळ्याला लावून रक्षक सापळ्यामध्ये ठेवला जातो. या कामगंधामुळे आंबाबागेमध्ये असलेले फळमाशीचे नर सापळ्याकडे आकर्षित होतात व त्यामध्ये अडकून मरतात. यामुळे फळमाशीचे पुढील प्रजोत्पादन थांबते व फळमाशीचा प्रादुर्भाव नियंत्रित करता येतो. सिंधुरत्न योजनेंतर्गत आंबा बागेतील फळमाशीचे नियंत्रण करण्यासाठी रक्षक सापळे व ल्युर्सचा पुरवठा करण्यात आला असून, शेतकरी बांधवांनी कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.