महावितरणच्या ‘अभय’ योजनेला वीज ग्राहकांचा प्रतिसाद
अभय योजनेचे शेवटचे फक्त 12 दिवस शिल्लक
रत्नागिरी: विजेच्या बिलाचा वेळीच भरणा न केल्याने रत्नागिरी परिमंडल कार्यालयांतर्गत 31,136 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला होता. या ग्राहकांना थकबाकीतून मुक्त होऊन पुन्हा वीज जोडणी घेण्याची संधी अभय योजनेच्या माध्यमातून महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ घेत रत्नागिरी परिमंडल कार्यालयातील 787 लघुदाब व उच्चदाब वीज ग्राहकांनी 65 लाख 80 हजारचा भरणा करत आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 540 ग्राहकांनी 52 लाख 86 हजार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 247 ग्राहकांनी 12 लाख 94 हजार रुपयांचा भरणा केला आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल. त्यामुळे जागा वापरासह विजेची गरज असो किंवा नसो, मात्र वीजबिलांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध आहे. अभय योजनेनुसार थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होत आहे.
योजनेचे शेवटचे फक्त 12 दिवस शिल्लक
वीजबिलांच्या थकबाकीमुळे दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व अकृषक वीजग्राहकांसाठी महावितरण अभय योजना दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना या योजनेत सहभाग नोंदवण्या करिता आजपासून (दि.20) फक्त 12 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
अद्याप 30,349 ग्राहकांना योजनेत सहभाग नोंदवण्याची संधी
महावितरणने कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या 30,349 ग्राहकांना या योजनेत सहभाग नोंदवण्याची संधी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 18,529 वीज ग्राहक तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 11,820 ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
जनमित्रांची महत्वाची भूमिका
या योजनेच्या जनजागृतीत जनमित्र अर्थातच वायरमन यांचे महत्वाचे योगदान आहे. ग्राहकांच्या शंकेचे निरसन केल्याने ते थकीत वीज बिल भरत आहेत. जनमित्र गावागावांत प्रत्यक्ष जाऊन ग्राहकांना या योजनेची माहिती व महत्व पटवून देत आहेत. जनमित्रांकडून जनजागृती अभियान सकारात्मक दृष्टीने राबविल्याने अभय योजनेस कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.