राजापूर : राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेले स्थानिक बीएमएस डॉक्टर आणि सहकाऱ्यांकडून रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा दिली जाते. मात्र, एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध झाल्यानंतर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या स्थानिक बीएमएस डॉक्टरला सेवामुक्त केले जाते. एमबीबीएस डॉक्टर पुढील वैद्यकीय शिक्षण वा ट्रेनिंगसाठी काही कालावधीसाठी गेल्याने रिक्त झालेल्या जागेवर पुन्हा एकदा स्थानिक बीएमएस डॉक्टरची नियुक्ती केली जाते. त्यातून सर्वसामान्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाला असून हे थांबणार कधी, असा सवाल शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले यांनी उपस्थित केला आहे.
पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लोकरे यांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. नागले, नाना कोरगावकर, सुनिल गुरव, सिद्धी शिर्सेकर, हर्षदा खानविलकर, मधु बाणे, सूर्यकांत सुतार आणि पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. या भेटीच्यावेळी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रूणालयातील वैद्यकीय अधिकार्यांह अन्य पदे तत्काळ भरणा करण्याची कार्यवाही आणि रूग्णांना चांगली सेवा मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तशी माहिती श्री. नागले यांनी दिली.
तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रातील एमबीबीएस डॉक्टरांच्या नऊपैकी केवळ तीन जागा भरताना तब्बल सहा आरोग्य केंद्रातील जागा गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्त राहिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर नाहीत, त्या ठिकाणी स्थानिक बीएमएस डॉक्टरची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेली आहे. या बीएमएस डॉक्टरांकडून सहकार्यांच्या साथीने चांगली वैद्यकीय सेवा दिली जात आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्राला एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध झाल्यानंतर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेल्या स्थानिक बीएमएस डॉक्टरला सेवेतून मुक्त केले जाते. एमबीबीएस डॉक्टरांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काही महिने सेवा बजावल्यानंतर हे डॉक्टर पुढील वैद्यकीय शिक्षण वा ट्रेनिंगसाठी काही कालावधीसाठी जात असतात. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पुन्हा एकदा स्थानिक बीएमएस डॉक्टरची नियुक्ती केली जाते. या साऱ्या प्रशासकीय खेळखंडोबामध्ये रुग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय सेवेचा पुरता बोजवारा उडतो. त्याचवेळी सातत्याने सेवामुक्त केले गेल्याने स्थानिक बीएमएस डॉक्टरच्या करिअरही धोक्यात येते. या सार्यामध्ये सर्वसामान्य रूग्णांची पुरती हेळसांड होत असून त्याचा विचार करीत या ठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध होण्याबाबत योग्य कार्यवाही व्हावी, अशी मागणी श्री. नागले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.