मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. भ्रष्टाचाराचे विविध आरोप झालेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.
दोघांचाही राजीनामा घ्यावा म्हणून विरोधक विधानसभा आणि विधान परिषदेतही आक्रमक होण्याचे संकेत आहेत. विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या मर्यादित असली तरी या अधिवेशनात सत्ताधार्यांना घेरण्यासाठी विरोधकांकडे पुरेसे मुद्दे असल्याने अधिवेशनाचा पहिला आठवडा वादळी ठरण्याची शक्यता आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवरून हे अधिवेशन गाजणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार हे 10 मार्चला राज्याचा सन 2025-2026 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लाडकी बहीण योजनेने राज्याच्या तिजोरीवरील बोजा वाढला असताना महायुती सरकार राज्याला कोणत्या नवीन योजना देणार याबाबत उत्सुकता आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण, परभणी येथील जिल्हा कारागृहामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा झालेला मृत्यू या दोन घटनांचे पडसाद अधिवेशनात उमटणे अपेक्षित आहे. अशावेळी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप तसेच मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने विरोधकांना त्यांना घेरण्याची संधी चालून आली आहे. या मुद्द्यावर विरोधक पहिल्या दिवसापासून आक्रमक होणार असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे विरोधकांच्या आरोपांना आणि हल्ल्याला तोंड देण्याची तयारी सत्ताधार्यांनी केली आहे. त्यांच्याकडे मोठे बहुमत आहे. तुलनेत विरोधकांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे विरोधकांना आपले मुद्दे सभागृहात मांडताना सत्ताधारी पक्षाच्या संख्याबळाच्या सामना करावा लागणार आहे. अशावेळी विरोधक सभागृहाच्या बाहेरदेखील आक्रमक होऊ शकतात.