कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक परिसराला महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली भेट
देवरुख-हिंदु धर्मासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांचे कसबा संगमेश्वर येथे भव्य दिव्य स्मारक उभारणीसाठी राजकारण न करता स्थानिकांसह सर्वांना बरोबर घेत पुर्णत्वास नेणेसाठी आपण कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन महसुल राज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांनी गुरुवारी देवरुख येथे पत्रकार परिषदेत केले आहे. माजी आमदार सुभाष बने यांच्या साडवली येथील रत्नसिंधू निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी कसबा येथील छत्रपती संभाजी स्मारक परिसराला भेट देवून जिल्हाधिकारी यांच्यासमवेत जागेची पाहणी केली.
या पत्रकार परिषदेप्रसंगी माजी आमदार सुभाष बने, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, राजेंद्र महाडिक आदिंसह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हिंदु धर्मासाठी अनंत यातना भोगत प्राणाची आहुती देत धर्म रक्षण करणारे हिंदू धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास व पराक्रमासह जीवनपट पुढील पिढीला समजावा यासाठी कसबा संगमेश्वर येथे भव्य स्मारक व्हावे यासाठी महायुती शासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. त्याच अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे महसूल राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी गुरूवारी कसबा येथील स्मारक परिसराला भेट दिली.
महापराक्रमी राजा व हिंदु धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मुघल बादशहा औरंगजेबाने फंद फितुरीने ज्या सरदेसाई वाड्यात कैद केले त्या कसबा येथील ऐतिहासिक वाड्यासह कसबा गावात भव्य स्मारक व्हावे म्हणून महायुती शासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. या स्मारकासाठी जुने सातबारा उतारे दाखवत काहीजण याला विरोध करत असल्याने संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यावर उपाय योजना करताना सरकारी जमीन व खाजगी जमिनी याची पूनश्च मोजणी करून घेत यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी स्थानिक जमिनदार, सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, संभाजी प्रेमी संघटना यांना विश्वासात घेऊन एकत्र करणेसाठी स्वतः पुढाकार घेऊन राजकारण न करता सामाजिक बांधिलकीच्या भावनेने हे आधुनिक व भव्यदिव्य स्मारक पुर्णत्वास नेणेचा माझा संकल्प आहे, राज्यमंत्री असे योगेशदादा कदम यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना ते म्हणाले कि,जिल्ह्यातील सामान्य जनतेला महसूल व ग्रामविकास विभागात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. संगमेश्वर तालुक्यातील महसूल विभागात सामान्य माणसाला सातबारावर चुकलेल्या नावात बदल करणे, वारस तपास, खालसा जमिनीवरील प्रकरणे आदी कामांसाठी जून्या कायद्याचा कीस पाडत न लागणारे कागदपत्रे सादर करण्याची सक्ती करून त्रास देत कामे वर्षानुवर्षे रखडवली जात असल्याचे निदर्शनास आणून भुमीआलेखमध्ये गटबुक नकाशा, मोजणी, प्राँप्रटी कार्ड आदींसाठी असे प्रकार जाणूनबुजून कोणी अधिकारी करत असतील तर अशा अधिकारी वर्गाची गय केली जाणार नाही असे सांगून कोणा शेतकरी बांधवाला असा त्रास दिला जात असेल तर त्यांनी माझ्याकडे कागदपत्रांसह तक्रारी दाखल करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.