मुंबई:- छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातीच्या सामान्य मावळ्यांना एकत्र करत देव, देश, धर्म व रयतेचे राज्य स्थापन करण्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली, त्यामुळे लाखोंची फौज घेऊन येणाऱ्या मुघलांनाही केवळ पाच हजार मावळे परास्त करायचे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रेचा शुभारंभ पुणे येथे झाला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव केवळ भारतामध्ये नाही तर जगातील 20 देशांमध्ये साजरा केला जातो. ज्यावेळी भारतातील अनेक मोठे राजे मुघलांचे मांडलिकत्व स्वीकारून त्यांच्यासोबत काम करत होते, अशा परिस्थितीमध्ये राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवरायांना मराठी मुलखाला व हिंदुस्थानला स्वतंत्र करायचे आहे, अशी शिकवण दिली.छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले लवकरच जागतिक वारसा केंद्र होणार आहेत. राज्यकर्ते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेली करांची रचना, शेतकरी हिताची कामे, जल, जंगल संवर्धन, अभेद्य तटबंदी, आरमार, समुद्रकिनाऱ्यांचे व्यवस्थापन, समुद्री सुरक्षा अशी प्रत्येक बाब महाराजांनी आपल्याला शिकविली. सामान्य माणूस, महिलांचे कल्याण, सन्मान यांचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडला. त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. एक मजबूत भारत, बलशाली भारत निर्माण करण्यासाठी ‘जय शिवाजी-जय भारत’ ही पदयात्रा आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, खा. मेधा कुलकर्णी, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आशिष शेलार, मंत्री दत्तामामा भरणे व इतर मान्यवर उपस्थित होते.