रत्नागिरी:- एस. टी.च्या विभागीय कार्यशाळा आवारातील भंगार लिलावात राज्यातील तब्बल 24 भंगार व्यावसायिकांनी भाग घेतला. भंगाराचा लिलाव झाल्यानंतर तो तातडीने उचलून नेला जावा, यासाठी प्रतिदिन 20 हजारांचे जागा भाडे आकारण्यात आले.
त्यामुळे लिलाव घेणार्या काही भंगार व्यावसायिकांच एस.टी.च्या अधिकार्यांसोबत शाब्दिक वाद झाले.
एमआयडीसीतील एस.टी. च्या विभागीय कार्यशाळेतील 4 कोटी रुपयांच्या भंगारचा लिलाव झाला. या लिलावात मुंबई, पुणे, कोल्हापूर, जालना, सातारा, सांगली, हैदराबाद येथील भंगार व्यावसायिकांनी भाग घेतला. ज्यांना लिलाव मिळाला त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या वजनाचे भंगार दुसर्या दिवसापासून ट्रकने विभागीय कार्यशाळेच्या आवारातून न्यायचे होते. ज्या व्यावसायिकांनी भंगार उचलण्यास विलंब केला, त्यांना भंगार ठेवलेल्या जागेचे प्रतिदिन 20 हजार रुपये इतके भाडे मोजावे लागले. सकाळी 8 ते सायं. 4 वाजेपर्यंत आवारातून भंगार नेण्याची मुभा होती.
कार्यशाळेच्या आवारात येणार्या ट्रकना काहीवेळ बाहेरच वाट पहावी लागत होती. त्यानंतर संबंधित लिलाव प्रक्रियेच्या समितीतील अधिकारी आल्यानंतर त्यांनी आवश्यक कागदपत्रे पाहिल्यानंतर तो ट्रक आत घेतला जात होता. त्यानंतर भंगार भरले जात होते. एखाद्या दिवसाचे भाडे भरण्यास उशीर झाला तर ते भाडे भरल्याची पावती दाखवल्याशिवाय ट्रकमध्ये भंगार भरण्यास एस.टी. च्या अधिकार्यांकडून मज्जाव केला जात होता.