मुंबई:- राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी ६ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी (एएनटीएफ) एकूण ३४६ नवीन पदे निर्माण करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
त्यासाठी २२.३७ कोटी रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाने सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यासही मान्यता दिली आहे.
मंत्रिमंडळ निर्णय
1) कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेतील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास तसेच योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी १५९४.०९ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात १,०८,१९७ हेक्टर क्षेत्राला लाभ. (जलसंपदा विभाग)
2) अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी (एएनटीएफ) एकूण ३४६ नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी, यासाठी २२.३७ कोटी रुपये इतका निधी खर्च करणार. (गृह विभाग)
3) सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता. (वित्त विभाग)
4) राज्यातील रोपवेची कामे राष्ट्रीय राज्यमार्ग लॉजिस्टीक व्यवस्थापन लि. (एनएचएलएमएल) मार्फत करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
5) जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पाला १२७५.७८ कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता. चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८२९० हेक्टर क्षेत्राला सिंचन मिळणार. (जलसंपदा विभाग)
6) मौजे एरंडवणा, पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला जागा नाममात्र १ रुपयात शासकीय जमीन. (महसूल व वन विभाग)