रत्नागिरी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे संविधान भारतीयांच्या सर्वंकष विकासाचा स्रोत असून हाच बलशाही लोकशाहीचा आत्मा आहे. संविधान गौरव महोत्सवानिमित्त संविधान घराघरात पोहोचवू या, असे आवाहन पाचल (ता.राजापूर) येथील मनोहर हरी खापणे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित ‘संविधान गौरव महोत्सव कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ते म्हणाले, भारतीय लोकशाही ही जगातील मोठी व यशस्वी लोकशाही म्हणून ओळखली जाते. राज्याचा मुलगा राजा होऊ शकतो, हा संकेत दूर लोटून झोपडीतला सर्वसामान्य युवकही या देशाच्या सर्वोच्चपदी बसू शकतो, हे संविधानाने दाखवून दिले आहे. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. विकास पाटील, प्रा. मुग्धा देवरूखकर, प्रा.पवन राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात डॉ. विकास पाटील यांनी संविधान गौरव महोत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धा, व्याख्यान, पुस्तक प्रदर्शन, पोस्टर स्पर्धा , निबंध स्पर्धा, कार्यशाळा अशा विविध कार्यक्रमांची माहिती दिली.