रत्नागिरी:- येथील ब्रह्मचैतन्य मंडळाने १३ कोटी राम नामजपाची सांगता केली. या प्रसंगी चिपळूण येथील प्रवचनकार धनंजय चितळे यांनी रामरक्षा या विषयावर प्रवचन केले.
जोशी पाळंद येथील घाणेकर यांच्या दत्तकुटी निवासस्थानी हा कार्यक्रम झाला.
रामरक्षा का म्हणावी, हे सांगणारा रामरक्षेतील श्लोक भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम् यावर चितळे यांनी विवेचन केले. रामरक्षेत रामाचे वर्णन केलेली रामाची मूर्ती डोळ्यांसमोर आणून प्रत्येक श्लोकाचा अर्थ आणून रामरक्षा म्हणावी. नुसते पाठांतर नको, यावर त्यांनी भर दिला. नामस्मरण, नामजप यांचा अर्थ सांगून जपाची संख्या महत्त्वाची नसून श्वासावर जप होणे महत्त्वाचे असते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सांगता श्रीधर पाटणकर यांच्या सुश्राव्य गायनाने झाली. कल्याणकरी रामराया ही प्रार्थना व त्यानंतरही रामनाम नौका या भैरवीने कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला बहुसंख्येने श्रोतृवर्ग उपस्थित होता. प्रवचनकारांचा परिचय सविता बर्वे यांनी करून दिला. सूत्रसंचालन अपर्णा मोने यांनी केले.