रत्नागिरी:-सहकारात सदैव डॉ. तानाजीराव चोरगे सरांच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहीन, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री तथा पालक मंत्री उदय सामंत यांनी सदिच्छा भेट दिली.
त्यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, रत्नागिरी जिल्हा बँकेचे काम कौतुकास्पद असून डॉ. चोरगे सरांनी बँक शून्यातून उभी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेने भरारी घेतली आहे. जिल्हा बँक भारतातीलच नव्हे तर जगातील ३० टक्के लाभांश देणारी एकमेव बँक आहे. अशा या नेतृत्वाला म्हणजे डॉ. चोरगे सरांच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँकेला माझा आतापर्यंत नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे यापुढेही सर बँकेत जो काही निर्णय घेतील, त्याला माझा पूर्ण पाठिंबा राहील. मला डॉ. चोरगे सरांबद्दल आदर आहे, सरांच्या बद्दल विश्वास आहे आणि त्या विश्वासामुळेच आजही तुमची आमची बँक उभी आहे. त्याचे सर्व श्रेय बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची शिस्त व त्यास बँकेचे सर्व संचालक व कर्मचारी यांनी दिलेली साथ यामुळेच आहे.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या १५ जिल्हा बँकांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच पेन्शनधारकांची खाती जिल्हा बँकेत उघडण्याबाबत निर्णय झालेला असून, त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश आहे, याचा मला रास्त अभिमान वाटतो. जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची व पेन्शनधारकांची खाती बँकेत उघडणेसंदर्भात संबंधित शासकीय खात्याचे अधिकारी यांना आदेश देणेबाबत मी जिल्हाधिकारी यांना तत्काळ सूचना करणार आहे, असे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी केले. कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, बँकेचे सर्व संचालक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण व बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.