चिपळूण:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील ब्रिटीशकालीन पूल तोडण्यास अखेर शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. पूल तोडण्यासाठी सव्वा कोटीहून अधिक निधी मंजूर होऊनही स्थानिकांच्या विरोधामुळे गेली 3 वर्षे पूल तोडण्याची कार्यवाही थांबली होती. मात्र चिपळूण बचाव समिती आणि नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे अखेर शुक्रवारपासून पूल तोडण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत वाशिष्ठी नदीवर नवीन पूल झाल्यानंतर जुन्या पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली. तत्पूर्वी 2021 च्या महापुरानंतर हा पूल तोडण्याची मागणी जोर धरू लागली. या पुलामुळे दसपटीकडून येणारे पाणी अडून त्याचा फुगवटा खेर्डीसह शहरात मारत असल्याने हा पूल तोडण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा पूल तोडण्यासाठी 1 कोटी 24 लाखांची निविदा काढली. त्यानुसार डिसेंबर 2021 मध्ये नियुक्त ठेकेदाराने पूल तोडण्यास सुरुवात केली असता त्याला विरोध करण्यात आला. कारण गणेशमूर्ती विसर्जनासाठी सद्यस्थितीत हा पूल महत्वाचा ठरत असल्याने पूल तोडू नये, अशी भूमिका विरोधकांनी घेतली होती.
गेली 3 वर्षे पूल तोडण्याबाबत बचाव समिती प्रत्येक बैठकांमधून या पुलाचा प्रश्न मांडत होती. विशेषत समितीचे अण्णा भोजने यांनी तर गेल्या 15 ऑगस्टला उपोषणाला बसण्याचा इशारा दिल्यानंतर पूल तोडण्याची कार्यवाही सुरू करत असल्याचे पत्र दिले होते. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनीही यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यानुसार अखेर शुक्रवारपासून हा पूल तोडण्यास सुरूवात झाली आहे.