चिपळूण: शिवसेना नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर अश्लाघ्य भाषेत खोटेनाटे आरोप कारुन त्यांची बदनामी करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्याविरोधात भास्कर जाधव यांचे सर्व सहकारी एकवटले आहेत. ऍड. नितीन केळकर यांच्या माध्यमातून त्यांनी नाहक बदनामी केल्याबद्दल तुमच्यावर 10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा का करण्यात येवू नये? अशा आशयाची नोटीस अण्णा जाधव यांना पाठवली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक काळात कळंबट जिल्हा परिषद गटातील एका बैठकीचा संदर्भ देत विकास उर्फ अण्णा जाधव यांनी या बैठकीत आमदार जाधव यांच्यावर बौद्ध समाजाबद्दल अनुद्गार काढल्याचा खोटा आरोप करत त्यांची बदनामी करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याविरोधात जाणीवपूर्वक मोहीम उघडली. कोणताही गैरशब्द काढलेला नसताना व या संदर्भातील कोणताही पुरावा नसताना त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या, मोर्चे काढले आणि त्या माध्यमातून आमदार जाधवांवर अश्लाघ्य शब्दात टीका करून त्यांची बदनामी केली. याचदरम्यान गुहागर तालुक्यातील नरवण येथे एका हॉटेलमध्ये विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाला. हा हल्ला आमदार जाधव यांनीच घडवून आणल्याचा आरोप करून त्यांनी त्यांच्यावर वाट्टेल ते आरोप केले. या घटनेचा निषेध म्हणून मुंडण मोर्चा काढला, तेव्हाही त्यांनी आमदार जाधव यांच्यावर अतिशय खोटेनाटे आरोप केले व खालच्या स्तरावर जावून टीका केली.
प्रत्यक्षात या घटनेचा तपास होवून आरोपींना पोलिसांनी अटक केली तेव्हा अण्णा जाधव यांनी केलेल्या आरोपांपैकी एकही आरोप सिद्ध झाला नाही. केवळ राजकीय सुडापोटी व निवडणुकीत आमदार जाधव यांचे नुकसान व्हावे, याच हेतूने अण्णा जाधव यांनी वारंवार त्यांच्या बदनामीची मोहीम उघडली होती, हे स्पष्ट झाले. भास्कर जाधवांच्या बदनामीविरोधात सर्व सहकारी एकवटले. त्यातूनच त्यांनी ऍड. केळकर यांच्या माध्यमातून अब्रुनुकसानीची नोटीस धाडली आहे.