चिपळूण:-चिपळूणात अंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे व चिपळूण येथे मुंबई-गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या पुलाच्या कामामुळे सध्या चिपळुणात धुळीच्या वाढत्या त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
चिपळूणमधील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली आहे. गाड्यांच्या रहदारीमुळे धुळीचे लोट घराघरांत शिरत आहेत. धुळीच्या त्रासाने चिपळूणकर सध्या बेजार झाले आहेत. मार्कंडीतील प्रभात रोड व आजूबाजूचे रस्ते व चिपळुणातील अन्य रस्त्यांवरदेखील धुळीचे साम्राज्य पसरले आहे. हजारो रुपये कर आकारणार्या चिपळूण नगर परिषदेला या रस्त्यावर पाणी मारण्याचे सौजन्य नसल्याने संताप व्यक्त होत आहे. लोकांनी ओरड केली की, तेवढ्यापुरते यंत्रणेकडून टँकरद्वारे रस्त्यावर पाणी शिंपडल्याचे नाटक केले जात आहे.
मुंबई-गोवा हायवेवर चिपळूण शहरात पुलाचे काम प्रगती पथावर आहे. याठिकाणीही आजूबाजूला राहणार्या रहिवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित ठेकेदार देखील रस्त्यावर पाणी मारत नसल्याने येथील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. सततच्या धुळीच्या त्रासाने अनेक प्रकारचे त्रास नागरिकांना सहन करावे लागत आहेत. घरामध्ये देखील धूळ येत असल्याने, हात लावाल तिथे धूळ, अशी स्थिती चिपळूण शहरात झाली आहे.
गॅसलाईनच्या खोदाईमुळे धुळीत भर
चिपळूण शहरात महानगर गॅसकडून गॅस लाईनचे काम सुरू आहे. यासाठी खोदाई करून पाईपलाईन टाकण्यात येत आहे. पण, पाईपलाईन टाकून झाल्यावर ते चर नुसते बुजवले जात असल्याने रस्त्यावरील धुळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. महिनोंमहिने उलटले तरी या चरावर डांबरीकरण अथवा काँक्रीटीकरण न झाल्याने परिस्थिती जैसे थे आहे. या गोष्टीकडेदेखील नगरपरिषद कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे.