गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नजर
रत्नागिरी:बारावीच्या लेखी परीक्षेला 11 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. ही परीक्षा 18 मार्च 2025 पर्यत चालणार आहे. या परिक्षेसाठी कोकण परिक्षा मंडळातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातून 24 हजार 541 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) ची लेखी परीक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात 38 तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात 23 अशी एकूण 61 परिक्षा केंद्रे आहेत. त्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयांची रत्नागिरीतील संख्या 163 तर सिंधुदूर्गमधील 89 इतकी कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून 16 हजार 54 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 8 हजार 487 विद्यार्थी ही परिक्षा देणार आहेत.
ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षेच्या दिवशी 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 रोजी पर्यंत सकाळी 9 वाजलेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत खालील प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहे.
परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. 100 मीटर परिसरातील एस.टी.डी. बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण इ. माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहील.
हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी/कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी/पोलीस अधिकारी यांच्याबाबत त्यांचे परीक्षा संबंधी कर्तव्य पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. मात्र, त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंध राहील. या आदेशाची जो अवमान्यता करील तो भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. या परिक्षेदरम्यान गैरप्रकारांना रोखण्यासाठी कोकण परिक्षा मंडळ स्तरावरून फिरत्या भरारी पथकांची नजर राहणार आहे.