मुंबईतून रत्नागिरीत येताना गाडीचा पाठलाग करून पोलिसांनी मुसक्या आवळल्या
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील एका तरुणाने रायगडमधील मच्छिमारांचे दीड कोटी बुडवल्याने राजापुरातील संशयित आरोपीला अलिबाग पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
अलिबाग कोळीवाडा येथील गोरगरिब मच्छीमारांना दीड कोटीचा गंडा घालणारा रत्नागिरी येथील तोतया व्यापार्याला अलिबाग पोलिसांनी अटक केली. नायब मजिद सोलकर (रा.नाटे, ता.राजापूर, जि.रत्नागिरी ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
नायब सोलकर याने 9 सप्टेंबर 2023 ते 10 जानेवारी 2024 या कालावधीत अलिबाग येथील लक्ष्मण सारंग, रणजित भगवान खमीस, प्रदोश गोरखनाथ तांडेल, विशाल हरिश्चंद्र बना ( रा.अलिबाग कोळीवाडा) यांच्याकडून खरेदी केली होती. त्या बदल्यात या सर्व व्यापार्यांना नायब सोलकर 1 कोटी 52 लाख रुपये देणे होते. मात्र,वांरवार मागणी करुनही नायब सोलकरने अलिबागच्या मच्छीमारांना मच्छीचे पैसे दिले नाहीत.
आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या मच्छीमारांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अलिबाग पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.182/2024, भा.द.वि.कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे 5 महिन्यापासून नमुद आरोपी हा त्याचा मोबाईल बंद ठेवून फरार झाला होता. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी, विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अलिबागचे पोलीस निरीक्षक किशोर साळे, यांच्या आदेशानुसार या गुन्हयाचा तपास पोलीस हवालदार हनुमंत सूर्यवंशी हे करीत होते.
सुर्यवंशी यांनी सायबर सेलच्या मदतीने तांत्रीक तपास करून माहीती प्राप्त केली. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी आरोपी नायब हा मुंबई येथुन रत्नागिरी येथे जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलीस पथकाने त्याच्या कारचा पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. नायब मजिद सोलकर याची चौकशी करून त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता १० फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या गुन्हयाच्या तपासात हनुमंत सुर्यवंशी यांना हवालदार अतुल जाधव यांनी सहकार्य केले.