रत्नागिरी:-फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या कोकणातील हापूस आंब्याची पाच डझनांच्या व अडीच डझनांच्या बॉक्सची शुक्रवारी (दि. 31) गुलटेकडी मार्केट यार्डात आवक झाली. पाच डझनांच्या या पेटीला तब्बल 21 हजार रुपये भाव मिळाला.
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे भागातील रीळ या गावातील शेतकरी मकरंद काणे यांच्या बागेतून मार्केट यार्ड फळबाजारातील मे. गणेश फ्रुट एजन्सी (पांगारे) या फर्मवर हापूस आंब्याची आवक झाली. फळे व तरकारी विभागप्रमुख बाळासाहेब कोंडे व अडतदार युवराज काची यांच्या हस्ते आंब्याच्या पेटीचे पूजन झाले.
रत्नागिरी हापूस आंब्याचा नियमित हंगाम हा मार्च महिन्यापासून सुरू होतो. त्यापूर्वी बाजारात हंगामपूर्व हापूस आंब्याची तुरळक आवक होत असते. आज झालेली ही आवक हंगामपूर्व असून, मार्च महिन्यात हंगाम सुरळीत सुरू होण्याचा अंदाज, व्यापारी अरविंद मोरे यांनी वर्तविला. याप्रसंगी, फळविभाग गटप्रमुख दादा बांदल, अडतदार गणेश यादव, राजू भोले, परेश शहा, नाना झेंडे, सुधीर मनसुख, व्यापारी सीताराम वाडकर, माऊली आंबेकर, विठ्ठल माने, फशी बागवान उपस्थित होते.आडते युवराज काची यांनी या आंब्याच्या पेटीची खरेदी केली.