नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया, आश्वासन हवेत
राजापूर : तालुक्यातील सौंदळ येथील हॉल्ट स्थानकाचे (थांबा) क्रॉसिंग स्थानकात रुपांतर करण्याबाबतचे आश्वासन कोकण रेल्वे प्रशासनाने देवून मोठा कालावधी लोटला तरी पुढील काहीच हालचाल न झाल्याने त्या आश्वासनाचे काय झाले, असा प्रश्न राजापूर पूर्व परिसरातून उपस्थित केले जात आहेत.
सौंदळ येथील हॉल्ट स्थानकात सार्वजनिक स्वच्छतागृहासह खराब बनलेल्या रस्त्यासह अन्य समस्या कायम असल्याने प्रवाशांना मात्र गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही वर्षात कोकण रेल्वेमध्ये अनेक सुविधा उपलब्ध झाल्यानंतर बरेच बदल झाले. अत्याधुनिक सेवा मिळाल्या. विद्युतीकरण वेगाने झाले. मात्र दुसरीकडे सौंदळ येथील हॉल्ट स्थानकाबाबत गेल्या काही वर्षात आवश्यक अशा सुधारणा झालेल्या नसल्याचे वास्तव आहे.
कोकण रेल्वे मार्गावर बहुतांशी राजापूर तालुक्याला सोयीचे ठरेल अशा सौंदळ येथे थांबा मिळावा, अशी सातत्याने मागणी तालुक्याच्या पूर्व परिसरातून होत होती.
तालुकावासियांच्या सुदैवाने कोकणचे सुपुत्र असलेले तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सौंदळ हॉल्टला मान्यता दिली होती आणि वर्षभरातच सौंदळ हॉल्टचे काम मार्गी लागून त्याचे उद्घाटनही प्रभूंच्या हस्ते पार पडले होते.
मागील काही वर्षात सौंदळचे कायमस्वरुपी स्थानकात रुपांतर करण्यात यावे, अशी सातत्याने मागणी होत असून हे स्थानक कसे उपयुक्त ठरेल ते विस्तृतपणे कोरे प्रशासनाच्या निदर्शनाला आणून देण्यात आले आहे. त्यानुसार सौंदळच्या हॉल्ट स्थानकातून कॉसिंग स्थानकामध्ये रूपांतरण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. मात्र त्याला बराच कालखंड उलटला तरी कोरे प्रशासनाने त्या बाबत काहीच निर्णय घेतलेला नसल्याचे दिसत आहे. काय झाले त्या आश्वासनाचे, असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे. संबंधित कोरे प्रशासनाला त्या आश्वासनाची आठवण करून द्या, अशीही मागणी होऊ लागली आहे.