रत्नागिरी:- कुंभमेळ्याहून रत्नागिरीत परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला सिन्नरजवळ पहाटे झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात चौघे जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात निवृत्त प्राचार्य प्रताप सावंत देसाई, वाहन चालक भगवान झगडे व अक्षय निकम यांचा मृत्यू झाला.
सर्व भाविक कुंभमेळ्यातील शाही स्नान आटोपून इनोव्हा गाडीने रत्नागिरीला परत येत होते. समोरुन येणार्या डंपरने जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की गाडीचा पुढील भाग पूर्णत: उद्ध्वस्त झाला. या अपघातातअक्षय निकम याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महामार्गावरुन प्रवास करणार्या वाहन चालकांनी थांबून अपघातग्रस्तांना सहाय्य केले.
रत्नागिरीतून कुंभमेळ्याला गेलेल्या इनोव्हा गाडीत माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई, निवृत्त शिक्षक श्री. रमाकांत पांचाळ, संतोष रेडीज, किरण निकम, त्यांचे चिरंजीव अक्षय निकम व नातेवाईक प्रांजल साळवी तसेच वाहन चालक भगवान तथा बाबू झगडे असे ७ जण प्रवास करीत होते. यापैकी तिघांचे दु:खद निधन झाले तर श्री. किरण निकम यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. संतोष रेडीज, रमाकांत पांचाळ व प्रांजल साळवी हे किरकोळ जखमी झाले आहेत.