सावर्डेतील तरूणासोबत केलाय विवाह
रत्नागिरी : रत्नागिरीत एसआयटीच्या पथकाने कारवाई करून ताब्यात घेतलेली बांग्लादेशी महिला गेली दहा वर्षे रत्नागिरीत वास्तव्यास आहे. या महिलेने आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड आदी भारत देशाचे पुरावे तयार केले आहेत. यामागे काही एजंट सक्रिय असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृष्टीने पोलीस तपासचक्रे गतिमान झाली आहेत.
बांग्लादेशी नागरिकांचे भारतातील कारनामे आता उघड होऊ लागले आहेत. बांग्लादेशीय नागरिकांना त्यांच्या देशात पाठवण्यासाठी देशपातळीवर प्रक्रिया सुरू आहे. रत्नागिरी तालुक्यात बांग्लादेशीय नागरिकांचे वास्तव्य हा चर्चेचा विषय ठरला आहे. शहरातील साळवी स्टॉप येथील भरवस्तीमध्ये बांग्लादेशी महिला सापडली आहे. तिचे बांग्लादेशीतील नाव सलमा मुल्ला असून ती रत्नागिरीत सलमा राहिल भोबंल या नावाने वावरत होती. ही महिला गेली पाच वर्षे येथे वास्तव्य करून आहे. तिने आधारकार्ड, पॅनकार्ड आदी भारत देशातील रहिवासी असल्याचे पुरावे तयार केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. त्या बांग्लादेशी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मुंबई येथे वास्तव्याला असताना सावर्डे (चिपळूण) येथील राहिल भोबंल याच्याशी तिची ओळख झाल्यानंतर ती त्यांच्या सोबत लग्न करून रत्नागिरीत रहायला आली होती. त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील नाखरे येथे चिरेखाणीवर काम करणाऱ्या 13 बांग्लादेशींना काही दिवसांपूर्वी पकडण्यात आले होते. त्यानंतर पोलीस दल व सुरक्षा यंत्रणा एकत्रित काम करून तालुक्यात व जिल्ह्यात ठिकठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. ही प्रक्रिया सुरू असतानाच शिरगाव ग्रामपंचायतीकडून एका बांग्लादेशी व्यक्तीला जन्मदाखला दिल्याचे उघड झाले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात बांग्लादेशातील अनेकांचे वास्तव्य असल्याचे पुढे आले आहे.
शिरगावप्रकरणी ग्रामसेवकासह तत्कालीन सरपंच व सदस्यांची मुंबई एटीएसकडून चौकशी केली गेली. ही दोन प्रकरणे ताजी असतानाच आज एटीएस आणि शहर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने साळवी स्टॉप येथे राहणाऱ्या एका बांग्लादेशी महिलेला पकडले. ही कारवाई एटीएसचे पोलीस उपनिरीक्षक विनय नरवणे, पोलीस अंमलदार स्वफ्नील तळेकर तसेच शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार शरद जाधव, कौस्तुभ जाधव, महिला पोलीस अपर्णा सुर्वे यांच्या पथकाने केली.