कोल्हापूर, मुंबईला जाण्याची गरज नाही
रत्नागिरी : राज्यातील कामगारांसाठी आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या राज्य कामगार विमा सोसायटीने राज्यात 18 नवी रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे. या रुग्णालयामध्ये ईएसआय योजनेत असलेल्या कामगारांना दिलासा मिळाला आहे. त्याच्यावर मोफत उपचार होणार आहेत. त्यामुळे आता या कामगारांना कोल्हापूर मुंबई येथे जाण्याची गरज भासणार नाही.
राज्य कामगार विमा सोसायटी राज्यातील कामगारांसाठी 12 रुग्णालये व संलग्न 253 रुग्णालयातून आरोग्य सेवा पुरवते. राज्यात विमाधारक कामगारांची 48 लाख 70 हजार 460 कुटुंबे आहेत. तर लाभार्थीसंख्या जवळपास दोन कोटीपर्यंत आहे. या कामगारांना अधिक चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी राज्यात विविध ठिकाणी 18 नवी रुग्णालये उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार रायगडमध्ये सर्वाधिक चार रुग्णालये असून पेण, पनवेल, कर्जत व खोपोली येथे ही रुग्णालय उभारण्यात येणार आहेत. तसेच छत्रपती संभाजी नगरमध्ये वाळूंज आणि शेंद्रा येथे, तर पुण्यामध्ये बारामती व चाकण येथे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पालघर, सातारा, अहमदनगर, नाशिक, जळगाव, वर्धा, अमरावती, सांगली, रत्नागिरी व चंद्रपूर येथे प्रत्येकी एक रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
ही रुग्णालये उभारण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून या जागा एमआयडीसी, जिल्हाधिकारी, डीपीआयआयटी, एसटीआयसीई, सिडको यांच्याकडून संपादित करण्यात येणार आहेत. यापैकी आठ रुग्णालयांसाठी स्थळ निवड समितीने जागांची शिफारस केली आहे, तर पाच रुग्णालयांसाठीच्या जागेचे प्रस्ताव ईएसआयसीच्या मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत. तसेच पाच रुग्णालयांच्या उभारण्यासाठी अद्यापपर्यंत राज्य सरकार किंवा एमआयडीसीने जागा निश्चित करून दिली नसल्याचे राज्य कामगार विमा सोसाटीकडून सांगण्यात आले. दरम्यान, या रुग्णालयांसाठी जागा संपादन करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. त्यामुळे या 18 नव्या रुग्णालयांच्या उभारणीचा मार्ग लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.