प्रशासनाकडून भूवैज्ञानिक तपासणी
सुमारे ३१० कोटींचा खर्च
मंडणगड:-नवीन बाणकोट-बागमांडला सीलिंक पुलासाठी भूमापन व भूवैज्ञानिक तपासणी प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे बाणकोट-बागमांडला हा मार्ग खाडीपुलाने अखेर जोडला जाईल, अशी आशा पुन्हा निर्माण झाली आहे.
सावित्री खाडीवर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून बांधण्यात येणारा नवीन बाणकोट बागमांडला सी लिंकचे कामाचे कंत्राट अशोका बिल्डकॉन कंपनीला मिळाले आहे. पुलाच्या कामाचे अंदाजपत्रक सुमारे ३१० कोटी रुपये आहे. रत्नागिरी आणि रायगड दोन जिल्ह्यांना जोडणारा व शासनाचे अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या बाणकोट खाडीवरील पुलाची भूवैज्ञानिक तपासणी सुरू झाली आहे. तीन वर्षात दीड किमी पुलाचे काम पूर्ण करून २०२८ पर्यंत पूल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सावित्री नदीवरील बाणकोट खाडीवरील हा पूल बाणकोट वेसवी (रत्नागिरी) आणि बागमांडला (रायगड) या दोन जिल्ह्यांना जोडणार आहे. हा मार्ग रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाचा एक भाग आहे. रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गावर सात सागरी सेतू बांधण्यात येणार आहेत. त्यातील दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्वाकांक्षी पूल आहे.