रत्नागिरी : आरटीई प्रवेश प्रक्रियेतील शाळा नोंदणी प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता विद्यार्थ्यी नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे. आत्तापर्यंत राज्यातील 8 हजार 624 खाजगी शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंदणी केली आहे. जिल्ह्यात 91 शाळांनी नोंदणी केली आहे. यामध्ये आता 782 जागा असणार आहेत.
त्या माध्यमातून 1 लाख 5 हजार 564 जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी 18 डिसेंबरपासून शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. नोंदणीसाठी 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र, संस्थाचालकांच्या उदासिनतेमुळे अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे 4 जानेवारीपर्यंत शाळा नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यामध्ये वाढ करण्यात आली होती.
सध्याच्या परिस्थितीत अनेक खासगी शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. खासगी शाळांकडून जानेवारी महिन्यापर्यंत आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून, एप्रिल महिन्यात काही काळासाठी शाळा सुरू करण्यात येतात. त्यानंतर जूनपासून नियमित शाळा सुरू होते. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाला एप्रिल महिन्यापर्यंत ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यंदा जानेवारीत प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यास, ही प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रवेशप्रक्रियेतून प्रवेश घेणारे विद्यार्थीही, नियमित विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेऊ शकतील.
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये राखीव असणार्या 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणारी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया जानेवारी महिन्यात सुरू होणार आहे. त्यामुळे यंदा पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी आॉनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची सुविधा लवकर उपलब्ध होणार आहे. सध्या या प्रवेशप्रक्रियेत शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
जिल्ह्यात 91 शाळांनी नोंदणी केली आहे. सर्वाधिक शाळा या चिपळूण येथे आहेत. तर प्रवेशासाठी जागांची सर्वाधिक संख्या ही रत्नागिरी तालुक्यात आहे. तब्बल 214 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.