रत्नागिरी:-रत्नागिरीच्या टिळक आळीत लोकमान्य टिळक यांचे राष्ट्रीय स्मारक सुशोभीकरणानंतरही दर सोमवारी साप्ताहिक सुटी घेऊन बंद ठेवण्यात येत होते. पण राजाभाउ लिमये यांया तक्रारीनंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लोकमान्य टिळक जन्मभूमी स्मारक आता सोमवारीही पर्यटकांसाठी खुले ठेवण्याचे निर्देश पुरातत्व विभागाला दिले आहेत.
राजाभाऊ लिमये यांनी यासंदर्भात रत्नागिरी दौ-यावर आलेल्या उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची नुकतीच भेट घेतली. त्यांनी लोकमान्य टिळक स्मारक जन्मभुमीसंदर्भात पर्यटकांचा होणारा हिरमोड याबाबत व्यथा मांडली. त्यामुळे स्मारकाला भेटी देण्यासाठी येणा-या देशी-विदेशी पर्यटकांचा हिरमोड होऊन स्मारक भेटीची संधी हुकल्याने तीव्र नापसंती व्यक्त केली जात होती.
मात्र मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ दखल घेत पुरातत्त्व खात्याच्या अधिका-यांना दूरध्वनीवरून हे स्मारक यापुढे कोणतीही सुट्टी न घेता वर्षाचे बारा महिने पर्यटकांसाठी खुले ठेवण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.लोकमान्य टिळक स्मारकाचे सुशोभीकरण सामंत यांनी मोठा निधी देऊन करून घेतले आहे. मात्र पुरातत्त्व खात्याला राष्ट्रीय स्मारकापुढे साप्ताहिक सुट्टी महत्वाची वाटत होती. यापूर्वीही दर रविवारी हे स्मारक बंद ठेवण्यात येत असे. याप्रकरणी साप्ताहिक सुट्टी रविवार ऐवजी सोमवारी घेऊन स्मारक बंद ठेवण्याचा प्रघात पडला होता. मंत्री सामंत यांच्या या कार्यवाही बद्दल लिमये यांनी त्यांच्या कार्याविषयी तसेच स्मारक प्रेमींकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.