जिंदल कंपनीच्या समोरील रस्ते अडवत वाहतूक रोखली!
रत्नागिरी : जिंदल पोर्ट कंपनीतील एलपीजी वाहतुकीस परवानगी दिल्याच्या वृत्तानंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी जिंदल कंपनीच्या समोरील रस्ते अडवत वाहतूक रोखली. या प्रकारामुळे प्रशासनाने ग्रामस्थांना वार्यावर सोडल्याची भावना व्यक्त करण्यात येत असून, दुर्घटनाग्रस्त विद्यार्थ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी जिंदलच्या पोर्ट विभागात झालेल्या वायुगळतीमुळे जवळपास 80 हून अधिक विद्यार्थ्यांना त्रास झाला होता. यामुळे जयगड पंचक्रोशीत पालक व विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण होते. यावेळी पोर्टवरुन एलपीजी वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती. या घटनेनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अपर जिल्हाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली कमिटी नेमली होती. या कमिटीला आठ दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पंधरा दिवसाहून अधिक कालावधी उलटला तरी कमिटीचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यातच जिल्हाधिकार्यांनी एलपीजी वाहतुकीला परवानगी दिल्याचे वृत्त आहे. जिंदल पोर्ट येथून पुन्हा एलपीजी वाहतूक सुरु झाली असल्याचे समजताच ग्रामस्थांमध्ये पुन्हा उद्रेक झाला. कंपनी ग्रामस्थांच्या जखमांवर मीठ चोळत असल्याचा आरोप करीत शुक्रवारी सायंकाळी ग्रामस्थ व पालकांनी जिंदल कंपनी आणि पोर्टकडे जाणार्या रस्त्यावर ठिय्या मांडत न्याय देण्याची मागणी केली. या घटनेमुळे जयगड पंचक्रोशीत जिंदल विरोधात जोरदार नाराजीच्या भावना उमटत आहेत.
घटनेनंतर जयगड पोलीस निरीक्षकांसह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गेटसमोर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईणकर यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली.