नुसत्या कॉलिंगसाठी मोठा नेटचा रिचार्ज मारण्याची गरज नाही
मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) एअरटेल, बीएसएनएल, जिओ, आणि वोडाफोन आयडिया यांसारख्या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांना परवडणाऱ्या व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएस प्लॅन्स सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. 2G वापरणाऱ्या ग्राहकांसाठी डेटा न वापरणाऱ्या योजना आणण्याचा आदेश TRAI ने दिला आहे, ज्यामुळे देशभरातील कोट्यवधी मोबाईल वापरकर्त्यांना दिलासा मिळणार आहे.
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश रिचार्ज प्लॅन्समध्ये डेटा पॅकचा समावेश असल्याने जुने फीचर फोन वापरणाऱ्या किंवा 2G नेटवर्कवर असलेल्या ग्राहकांना जास्त खर्च येतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी TRAI ने स्पेशल टॅरिफ व्हाउचर (STV) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत, जे केवळ व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएससाठी असतील.
TRAI चे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले की, डेटा वापराला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे, परंतु ग्राहकांवर ते लादले जाऊ नये. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार सेवा निवडता येईल, यासाठी TRAI प्रयत्नशील आहे. कंपन्यांना स्वतःच्या योजनांचे प्रमोशन करण्याची मुभा आहे, पण ग्राहकांसाठी अनुकूल पर्याय देणे बंधनकारक आहे.
TRAI ने नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार कंपन्यांना रिचार्ज व्हाउचर्सची वैधता 90 दिवसांवरून 365 दिवसांपर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे ग्राहकांना दीर्घकालीन पर्याय मिळतील. याशिवाय, रिचार्ज कूपनवर रंगकोडिंग (कलर कोडिंग) करण्याची आवश्यकता रद्द करण्यात आली आहे. मात्र, ₹10 च्या किमान रिचार्जचा नियम 2012 च्या आदेशानुसार कायम ठेवण्यात आला आहे.
खुशखबर : जुने, छोटे मोबाईल वापरणाऱ्यांसाठी कंपन्यांनी आणले स्वस्त कॉलिंग दर
