आमदार भास्कर जाधव यांनी केली पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार
चिपळूण :रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा बोजवारा उडाल्याची तक्रार गुहागरचे आ. भास्कर जाधव यांनी राज्याच्या पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे व या कामांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
मंत्री म्हणून याआधी चौकशीचे आश्वासन देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याबद्दल आ. जाधव यांनी खेद व्यक्त केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा बोजवारा उडाला आहे. या विषयी 7 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत 25 टक्के कामेही पूर्ण न झाल्याचे उघड झाले होते. या कामाचा कोणताच अनुभव नसलेल्या ठेकेदारांना शंभर-शंभर कोटींची कामे देण्यात आली आहेत. ते या योजनेचे काम करीत नाहीत आणि झालेल्या कामांनाही दर्जा नाही. याकडे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, असे आ. जाधव यांनी बैठकीत दाखवून दिले होते. याच बैठकीत जीवन प्राधीकरणचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित सैनी यांनी ही वस्तूस्थिती मान्य केली होती. यावेळी डॉ. सैनी यांनी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार नेमलेले असताना अनेक योजना जि.प.ने आपल्याकडे घेतल्या आहेत.
जि. प.ला योजना पूर्ण होण्यासाठी अभियंते व कर्मचारी घ्या असे सांगूनही ते घेण्यात आलेले नाहीत, हा मुद्दा समोर आला होता. यावेळी बैठकीत पाणीपुरवठा मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करीत काम न करणार्या ठेकेदारांना तत्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले होते व कामाच्या तपासणीसाठी मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांचे पथक गुहागरसह जिल्ह्यात पाठविण्याचे आदेशही दिले होते. परंतु गत वर्षात यावर कोणतीही कार्यवाही वा चौकशी झाली नाही. परिणामी या योजनेची कामे अर्धवटच आहेत. अनेक ठिकाणी झालेली कामे निकृष्ट झाली असून शासनाचे शेकडो कोटी रूपये वाया गेले आहेत, असे आ. जाधव यांनी म्हटले आहे.