माझं काही कमी जास्त झाल्यास सगळी जबाबदारी सरकारची राहील : राजन साळवी
रत्नागिरी : शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे उपनेते व कोकणातील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी “सरकार बदललं आणि आपली वाय प्लस सुरक्षा काढण्यात आली. मात्र निवडणुकीपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपल्याला एक पोलीस दिला आहे, पण माझं काही कमी जास्त झाल्यास या सगळ्याची जबाबदारी ही या सरकार वर राहील” असा इशारा, माजी आमदार राजन साळवी यांनी दिला आहे. भाजपमधील प्रवेशाच्या चर्चेबाबत ते म्हणाले की “मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केलं आहे. आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे.” असं सांगत थेट उत्तर देणे टाळले आहे.
मी नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, तीन वेळा आमदार आता उपनेता अशा विविध पदांवर काम केले केल आहे. हा माझा राजकीय प्रवास आहे. त्यामुळे तेव्हा मला अनेक वेळा धमकीही आल्या आहेत. शत्रुत्वही घ्यावं लागलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली होती. मात्र त्यानंतर दुर्दैवाने सरकार बदललं आणि माझी सुरक्षा काढून घेण्यात आली.” असाही नाराजीचा सूर त्यांनी यावेळी व्यक्त केला. मात्र निवडणुकीपूर्वी मला एक सुरक्षेसाठी पोलीस देण्यात आला. मात्र मी एक सांगेन की माझ्यावर कोणी किती हल्ला केला तरी त्याला उत्तर देण्यासाठी आमचे शिवसैनिक समर्थ असून सडेतोड उत्तर देतील. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.