मुंबई:-काही दिवसांपासून राज्यातील विविध विभागांतून धावणार्या शिवशाही बसचे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने अपघात, ब्रेकडाऊन लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यातील सर्व शिवशाहीची विशेष तपासणी विशेष अधिकार्यांमार्फत करण्यात येणार आहे.
या तपासणीचा अहवाल चार जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या 792 शिवशाही धावतात. शिवशाही बसेस तपासणीस 26 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. तपासणी करून चार जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश राज्यातील सर्व विभागातील यांत्रिक विभागांना वरिष्ठ अधिकार्यांनी दिले आहेत.
बसची अवस्था दयनीय
महामंडळाने आठ वर्षांपूर्वी शिवशाही बस भाडेतत्त्वावर घेतल्या. मात्र, आता बसची अवस्था दयनीय झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवशाहीचे अपघात वाढले आहेत. तसेच ब्रेकडाऊनचे प्रमाणदेखील वाढले आहे. बसमधील एसी बंद, सीट कव्हर आणि पडदे अस्वच्छ असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. वातानुकूलित बसच्या नावाखाली जास्त पैसे घेऊनही चांगल्या सुविधा दिल्या जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. वाढते अपघात आणि तक्रारीच्या अनुषंगाने महामंडळाने प्रत्येक विभागातील शिवशाहींची विशेष तपासणी करण्याचे आदेश सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.
उणिवा व उपाययोजनांबाबत होणार मंथन
तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटी, उणिवा, त्याकरिता कशाप्रकारे उपाययोजना करता येतील आदींबाबतची तपासणी करावी. त्याचा तपासणी अहवाल संबंधित विभागास व मुख्य कार्यालयास चार जानेवारीपूर्वी ई-मेलद्वारे सादर करण्याचे आदेश महाव्यवस्थापकांनी दिले आहेत.
‘शिवशाही’च्या अपघातांची स्थिती
एकूण अपघात जून 2017 ते
ऑक्टोबर 2019 : 550
जून 2017 ते मार्च 2018 या कालावधीत : 83 अपघात, 7 मृत्यू, 67 जखमी
एप्रिल 2018 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत : 442 अपघात, 43 मृत्यू, 300 जखमी