रत्नागिरी:-पूर्व माध्यमिक पाचवी आणि उच्च माध्यमिक आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षांचा निकाल बुधवारी जाहीर झाला. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून इ. पाचवीतील परिक्षेला बसलेल्या प्राथमिक शाळांतील 8 हजार 83 विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 223 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर इ. 8 वीमधील परिक्षेला बसलेल्या एकूण 5 हजार 38 विद्यार्थ्यांपैकी 988 उत्तीर्ण ठरले आहेत. या परिक्षेत इयत्ता 5 वीमधील शिष्यवृत्तीधारक 290 तर इ. 8 वीमधील 306 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले.
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना गणित, इंग्रजीबरोबरच शिष्यवृत्ती परिक्षेत प्राविण्य मिळावे यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने ‘विशेष मार्गदर्शन उपकम’ राबवण्याचा निर्णय घेतला. त्याचा सकारात्मक परिणाम घेतल्या गेलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेच्या निकालातून समोर येत आहे.
यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातून शिष्यवृत्ती परिक्षेसाठी विद्यार्थ्यांमध्ये इ. 5 वी मधील 8 हजार 172 विद्यार्थी नोंदवले गेले होते. त्यापैकी परिक्षेला 8083 विद्यार्थी उपस्थित होते. एकूण 2223 विद्यार्थी पात्र तर 4050 विद्यार्थी अपात्र ठरले. ही पात्रता टक्केवारी 27.51 इतकी आहे. तर या परिक्षेसाठी इ. 8 वी मधील 5 हजार 114 विद्यार्थी नोंदवले गेले होते. त्यापैकी परिक्षेला 5038 विद्यार्थी उपस्थित होते. एकूण 988 विद्यार्थी पात्र तर 5860 विद्यार्थी अपात्र ठरले ही पात्रता टक्केवारी 19.62 इतकी आहे.