बचत गटातील महिलांना 15 हजार ऐवजी आता 30 हजार रूपये मिळणार
रत्नागिरी:-राज्य शासनाकडून नुकत्याच सादर करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे, जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत.
उत्पन्नाचे दाखले अधिक जलद गतिने उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्वतंत्र यंत्रणा उभारणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली. अर्थसंकल्पामुळे महिला, युवा व शेतकरी यांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे तसेच कापुस, सोयाबीन दुधउत्पादक शेतकरी यांना देखील चांगले दिवस या अर्थसंकल्पामुळे येणार आहेत. राज्याच्या 17 शहरांमध्ये महिलांसाठी पिंक रिक्षा योजना, शेतकऱ्याना कृषीशेती पंप वीजबील माफ करणे आदी कारणांमुळे सर्वांना लाभदायी असा अर्थसंकल्प ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता विरोधकांना पुढचे 25 वर्षे त्यांना विरोधात बसवतील असा टोला सामंत यांनी विरोधकांना लगावला.
शासनाच्या पिंक रिक्षा योजनेसाठी एकूण 80 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती तर लाडकी बहिण योजनेसाठी 46 हजार कोटी रूपये देण्यात आले आहेत. मुलींच्या लग्नासाठीची रक्कम 10 हजार रूपयांवरून 25 हजार तर बचत गटातील महिलांना मिळणारे 15 हजार रूपये आता 30 हजार रूपयांपर्यंत वाढविण्यात आले आहेत. महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन काम करत असून येत्या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे सामंत यांनी सांगितले.