पोलिसांच्या खबऱ्याच्या संपर्कात आला अन्…
रत्नागिरी:-रेल्वेत चोरी करुन पसार झालेल्या आरोपीला पकडण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या खबऱ्याच्या संपर्कात आल्याने हा चोरटा पोलिसांच्या तावडीत सापडला. ही कारवाई शहर पोलिसांतील गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या पोलिसांनी केली. न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद जगन्नाथ पाटील (30, रा. भेरसे, अलिबाग, रायगड) असे चोरट्याचे नाव आहे. ही घटना 26 मे 2024 ला रेल्वेत घडली होती. अन्नमा जोसफ (56, रा. केरळ, सध्या रा. डोंबिवली) हे केरळ ते मुंबई प्रवास करत होते. त्यांना कोकण रेल्वे मार्गावरील आडवली ते रत्नागिरीदरम्यान झोप लागली. त्याचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांची बॅग व दहा लाखाचे दागिने चोरुन नेले. जोसेफ यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
त्यानंतर 1 महिन्यानंतर पोलिसांनी चोरट्याला पकडले. प्रसाद पाटील हा मडगाव येथील पोलिसांच्या खबऱ्याच्या संपर्कात होता, ही बाब लक्षात येताच शहर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे मडगाव येथून प्रसाद पाटील याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी शहर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक श्याम आरमळकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक साळवी, पोलीस हवालदार अरुण चाळके, राहुल जाधव, अमोल भोसले, पोलीस नाईक पंकज पडेलकर, आशिष भालेकर, भालचंद्र मयेकर, पोलीस शिपाई अमित पालवे यांनी केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्याम आरमळकर करीत आहेत.