संगमेश्वर येथील घटना, एकही विद्यार्थी शाळेत गेला नाही
संगमेश्वर:-विद्यार्थ्याने गृहपाठ केला नाही म्हणून मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापिकेविरुद्ध तेऱ्ये जिल्हा परिषद शाळा कमांक 1 च्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारत शाळेच्या पहिल्या दिवशी एकही विद्यार्थी शाळेत पाठविला नाही.संगमेश्वर तालुक्यातील तेऱ्ये येथील जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक 1 मधील विद्यार्थ्यांने गृहपाठ पूर्ण न केल्याने शाळेतील विद्यार्थी रुद्र आनंद घवाळी( इयत्ता तिसरी )याला शाळेच्या मुख्याध्यापिका नीलांजली चव्हाण यांनी मारहाण केली होती. तसेच शाळेतील आणखी काही विद्यार्थ्यांच्या मुख्याध्यापिकेविरुद्ध तक्रारी होत्या. याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी नाईक आणि केंद्रप्रमुख सावंत यांनी चौकशी केली होती तसा अहवाल त्यांनी वरिष्ठ पातळीवर दिला होता. मात्र याबाबत कोणतीही हालचाल न झाल्याने शेवटी ग्रामस्थांनी शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देत या प्रकरणी सखोल चौकशी तसेच मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्याचे मागणी केली होती. शनिवारी जिल्हा परिषद शाळेचा नवीन वर्षाचा पहिला दिवस होता मात्र त्यादिवशी ही मुख्याध्यापिका आल्याने आणि तक्रार देऊन कोणतीही कारवाई न केल्याने ग्रामस्थांनी आणि पालकांनी शनिवारी एकही विद्यार्थी न पाठवण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी पालक आणि ग्रामस्थांनी नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मात्र शाळेत एकही विद्यार्थी पाठवला नाही. तसेच मुख्याध्यापिका नीलांजली चव्हाण यांच्यावर कारवाई केल्याशिवाय एकही विद्यार्थी शाळेत पाठविणार नसल्याचे निवेदन शिक्षण विभागाला दिले आहे.