चौपट मोबदला मिळाल्याशिवाय जमीन देणार नाही: शेतक-यांचा निर्धार
रत्नागिरी:- रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते अंकली या महामार्गाच्या मोजणीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचेकडून कार्यवाही करण्यात येत आहे.सदरच्या संपादीत होणाऱ्या जमिनीस चौपटीप्रमाणे मोबदला न देता पोलीसबळाचा वापर करून जबरदस्तीने मोजणी केल्यास जशास तसे उत्तर देवू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला.
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, भूमी अभिलेख विभागाकडून कोणतीही अद्यावत कागदपत्रे न तपासता तसेच संबधित शेतकऱ्यांना नोटीसही लागू न करता जुन्या कागदपत्राव्दारे मोजणी करण्याचे काम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हद्दी निश्चीती नसून वाटणीपत्र न झाल्याने मोजणी पूर्ण होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. सदरच्या भुसंपादनामध्ये संपादित केल्या जाणाऱ्या जमीनींना राज्य शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे दुप्पट मोबदला दिला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून रत्नागिरी ते नागपूर या ९४५ किलोमीटरच्या महामार्गातील जवळपास ९०७ किलोमीटरचे संपूर्ण भुसंपादन हे चौपटीने झालेले आहे. यामुळे याच मार्गावरील चोकाक ते अंकली हा ३८ किलोमीटरच्या रस्त्यासाठी चौपट मोबदला देवूनच जमीन संपादित करावी. सध्या चोकाक फाटा ते अंकली येथील नवीन रस्त्याच्या चोकाक, अतिग्रे, उदगांव या गावातील मोजणीची कार्यवाही युध्दपातळीवर सुरू आहे.
यापूर्वीही शिरोली ते अंकली रस्त्याचे २००८ साली भुसंपादन होत असताना अत्यल्प दराने मोबदला दिला गेला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या मार्गावरील अनेक शेतकऱ्यांची संपूर्ण जमीन संपादित होणार असून त्यामुळे ते भुमिहीन होणार आहेत. शासनाने रत्नागिरी ते नागपूरपर्यंत जो मोबदल्याचा दर रेडिरेकनरच्या अथवा बाजारभावाच्या चौपटीने शेतकऱ्यांना दिला आहे. तोच दर या शेतकऱ्यांना दिल्यास शेतकरी भुसंपादनास कोणताही विरोध करणार नाहीत. एकाच जिल्ह्यातील एका शेतकऱ्यास दुप्पट व एका शेतकऱ्यास चौपटीने दर देवून प्रशासनाच्या चुकीचे खापर शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. तसेच उमळवाड येथून अंकली रस्त्यापर्यंत जाणारा महामार्ग हा भरावाचा न करता पिलरचा करावा लागणार असून अन्यथा सांगली शहरासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३५ हून अधिक गावांना पुराचा फटका बसणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.