रत्नागिरी:- लोकसभा निवडणूकीमुळे आचारसंहितेत अडकलेल्या जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरतीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेल्या या कर्मचारी भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांची लेखी परीक्षा 10 जूननंतर होणार आहे. कंत्राटी ग्रामसेवकाच्या 185 जागेसाठी तब्बल 41 हजार 145 अर्ज दाखल झाले आहेत.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व 4 च्या भरती प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये विविध संवर्गाच्या 700 जागा रिक्त होत्या. त्यासाठी भरती प्रक्रिया होती. यापैकी अनेक जागांसाठी लेखी परीक्षाही घेण्यात आली होती. मात्र मध्यंतरी यातील काही संवर्गातील पदासाठी भरतीवर आक्षेप घेण्यात आला होता. याभरतीसंदर्भात काही उमेदवार न्यायालयात गेले होते. विशेषत: ग्रामसेवक या पदासाठी न्यायालयात गेले होते. हा विषय न्यायालयाने निकाली काढत भरती करण्याचे आदेश दिले. परंतु त्याच दरम्यान लोकसभा निवडणूक आल्याने ही भरती प्रक्रिया अडकली होती.
आता लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता संपल्यानंतर ही रखडलेली भरती प्रक्रिया होणार आहे. जि.प.जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गाच्या 18 पदांच्या 715 जागांसाठी 70 हजार 608 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यात ग्रामसेवक पदासाठी सर्वाधिक अर्ज म्हणजे तब्बल 41 हजार अर्ज दाखल झाले होते. 3 ऑक्टोबर पासून परीक्षा सुरू झाली होती. फक्त ग्रामसेवक पदासाठी अजूनही परीक्षा निश्चित झालेली नाही.